फोटो सौजन्य - Social Media
गिरीश रासकर, अहमदनगर : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पढेगाव ते राहुरी या 14 कि.मी. अंतराची चाचणी सोमवारी घेण्यात आली. येत्या काही कालावधीमध्ये नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असून यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता सोमवारी 14 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 135 किमी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वे गाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच ठिकाणी थांबुन ठेवावी लागत होती. मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या द्रुतगती रेल्वे मार्गावर प्रवरा नदी वरील 305 मीटर लांबीचा व 12 मीटर उंचीचा, गोदावरी नदी वरील 288 मीटर लांबीचा व 18 मीटर उंची असलेले सर्वात मोठे दोन पुल बांधण्यात आले आहेत.
ह्या रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गा मधील सर्वात मोठया लांबीचे व उंचीचे पूल असून या पुलामुळे नगर – मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे. या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने, रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे.
सोमवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला तर नगर ते मनमाड पर्यंतचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे यावेळी ताशी 130 वेगाने धावली रेल्वे या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पढेगाव ते राहुरी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राकेश कुमार यादव,उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी पी पटेल,कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा,सेक्शन इंजिनिअर आर डी सिंग,सेक्शन इजिनिअर,धर्मेंद्र कुमार,इजिनिअर सुद्धांसू कुमार,ज्युनियर इंजिनियर,प्रगती पटेल,इंजिनियर रामजी कुमार एक्झिकेटीव, इंजिनिअर व आदी उपस्थित होते.