
महाराष्ट्रात आलेल्या चक्रीवादळाने ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २५०० पेक्षाही जास्त घरे कोसळली आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये तर पावसाने कहरच केला. येथे २४ तासांत १३२ मि. मी. पाऊस पडल्यामुळे नद्यांना महापूर आला. अनेक वृक्ष उन्मळून पडले. कोकणात आंबे आणि काजूचे पीक नष्ट झाले.
मुंबईची २० उपनगरे जलमय झाली. या चक्रीवादळात २ मालवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली होती. या जहाजांच्या बचावासाठी ३ युद्धनौका पाठविण्यात आल्या. या जहाजामध्ये ४०० लोक होते. गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळामुळे २० लोकांचा मृत्यू झाला. गुजरातमधील जुनागड, गिर-सोमनाथ, भावनगर आणि अमरेली येथे चक्रीवादळाची तीव्रता सर्वाधिक होती. याशिवाय या परिसराला भूकंपाचे धक्केही बसले.
केरळमध्ये समुद्रात मासेमारी करणाऱ्या १२ मासेमारांना तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रातून बाहेर काढले. बचावकार्य करण्यासाठी १८० तुकड्या तैनात करण्यात आल्या. मुंबईच्या गेट- वे ऑफ इंडियाला उंच सागरी लाटांचा तडाखा बसला. हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. विमानसेवा स्थगित करण्यात आली.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ऑरेंज तर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडले. रस्त्यांच्या किनाऱ्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर वृक्ष पडल्यामुळे कित्येक गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे सरकारपुढे नवीन आव्हान उभे केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
New cyclone crisis from Kerala to Gujarat Rains in Ratnagiri mango and cashew crops in Konkan were destroyed