
रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
आज सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोक्याची पातळी ७.०० मीटर आहे. त्यामुळे नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
वाढत्या पाणीपातळीचा परिणाम आता शहरातही दिसू लागला असून खेड शहरातील मटण मार्केट परिसरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पाणी हळूहळू वाढत असल्याने व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील आणखी काही सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच खेड–खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पूराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही पाण्याखाली गेल्या आहेत. काही गावांचा संपर्क धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.