देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे. महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र, लशींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली.
राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लशीच्या साठ्याची माहिती दिली. टोपे म्हणाले,”१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे.
त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे,” अशी माहिती टोपे यांनी दिली.