
महाराष्ट्रात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभेत ही आघाडी अशीच टिकेल का? हा प्रश्नच आहे. पण, आता या प्रश्नावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात भाकित केलं आहे.
“शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि भाजपशी युती करावी.” असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमासाठी अमरावतीत आले असता कार्यकर्त्यांशी संवाद सादताना हे वक्तव्य केलं आहे.
आठवले म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्यात नेहमीच भांडणं होत आहेत. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीय.. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे भाजपशी युती करावी आणि आपलं सरकार स्थापन करावं. तरच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल.” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता यावर शिवसेने, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांच्या काय प्रतिक्रीया येतात हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.