फोटो सौजन्य: Freepik
रक्तदान हेच श्रेष्ठदान! हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो. वास्तविक रक्तदान करणे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. या चांगल्या कार्यामुळे आपण एखाद्याचे प्राण सुद्धा वाचवू शकता. देशात अनेक लोकं आहेत जे रक्तदान करत असतात. रक्तदान ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ज्यात एक व्यक्ती एका वेळी 1 युनिट रक्त दान करू शकते. एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकतो.
असे असूनही रक्तदानाबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न आणि गैरसमज आहेत, जसे की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो का? शरीरातील पोषक घटक कमी होतात का? आणि यामुळे माणूस पुन्हा पुन्हा आजारी पडतो का? वास्तविक रक्तदान केल्याने फक्त रक्त घेणाऱ्यालाच नव्हे तर रक्त देणाऱ्याला सुद्धा फायदा होतो. एका महिन्यात किती रक्तदान केले जाऊ शकते आणि त्याचे आरोग्यासाठी खरे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
1. शरीर सर्व रोगांपासून सुरक्षित राहते.
2. मेंदू सक्रिय होतो.
3. रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते.
4. वजन नियंत्रणात राहते.
5. कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
6. भावनिक आरोग्य देखील सुधारते.
7. शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात.
8. शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते.
केवळ निरोगी व्यक्तीच रक्तदान करू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 18 वर्षांखालील आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक रक्तदान करू शकत नाहीत. इंडियन मेडिकल कौन्सिलनुसार, एक निरोगी व्यक्ती 3 महिन्यांतून एकदाच रक्तदान करू शकते. त्यामुळेच महिन्यातून एकदा रक्तदान करणे सुरक्षित नाही.
तज्ज्ञांच्या मते रक्तदान केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान शरीराला होत नाही. तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु ही समस्या निरोगी आहाराने लवकर बरी होऊ शकते. रक्तदान केल्यानंतर लोहयुक्त पदार्थ नेहमी खावेत. तसेच वाटाणा, मसूर, फरसबी, पालक यासारख्या हिरव्या भाज्या सुद्धा खाव्यात.






