
राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा...
पुणे : सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरु आहे. असे असताना आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा आजपासून (दि.20) सुरू होत आहे. राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८७९ ने जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर, राज्य मंडळासमोर यावर्षी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दहावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत माहिती दिली. त्यांच्यासोबत सचिव डॉ. दीपक माळीदेखील उपस्थित होते. राज्य मंडळाचे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमध्ये २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. डॉ. बेडसे यांनी सांगितले की, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक आहे.
हेदेखील वाचा : 10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद
दरम्यान, बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे राज्य मंडळासमोर आव्हान आहे. त्यामुळे यंदा पाच हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार १३० परीक्षा केंद्रे होती. मात्र, गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे ३१ परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली.
9 विभागीय मंडळामार्फत घेतली जाणार परीक्षा
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. ‘परीक्षार्थ्यांनी नेमून दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
झेरॉक्सची दुकाने बंद
शिक्षण विभागाच्या नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आणि कार्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती काढून देणारी (फोटोकॉपी) दुकाने बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.