
फोटो सौजन्य - Social Media
गेल्या सहा दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम शहरातील विविध भागांमध्ये दिसून येत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत, रस्त्यांवर पाणी साचले आहे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर कल्याणजवळील टिटवाळा येथे रस्त्याला भगदाड पडल्याची घटना घडली. याशिवाय, कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या आरोग्य विभागाची संरक्षण भिंत एका सोसायटीवर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अशातच डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील सुमिती निवास इमारतीचा काही भाग कोसळल्याने धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. आता तरी महापालिकेने तातडीने या धोकादायक इमारतीवर पाडकामाची कारवाई करून भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.