
अकोल्यातील 'काटेपूर्णा'त 25 टक्केच जलसाठा; मोठ्या जलसंकटाची शक्यता
अकोला : ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने अकोला जिल्ह्यावर मोठे जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी खालावली असून, सध्या या प्रकल्पात केवळ २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली आहे. इतर प्रकल्पांमध्ये संमिश्र जलसाठा असला, तरी अकोला शहराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील कमी साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच आगामी चार दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोलावासियांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेल्याने आता सप्टेंबर महिन्यात तरी दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा अकोलावासियांकडून व्यक्त होत आहे.
सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाल्यास काटेपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते. बुधवारी सकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आलेल्या जलसाठा अहवालानुसार, काटेपूर्णा प्रकल्पाची जलपातळी ३४१.५५ मीटर असून, प्रकल्पात २१.५११ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २४.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी काटेपूर्णा प्रकल्पात तब्बल ८९.७३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात झालेली प्रचंड घट चिंताजनक आणि गंभीर बाब मानली जात आहे.
उपाययोजना करण्याची गरज
यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे उपडीप दिल्याने घरणामध्ये नवीन पाण्याची आवक जवळपास थांबली आहे. परिणामी, प्रकल्पामधील जलसाठधात अपेक्षित वाढ झालेली नाही. उपलब्ध पाणीसाठा पुढील काळासाठी कसा नियोजित करायचा, तसेच पाणीपुरवठ्याचे संकट टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायाय, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.