मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यावर सध्या खूप टीका होत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 30, 2022
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.
त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं होतं की, मुंबईमधून जर गुजराती आणि राजस्थानी समाज काढून टाकला तर मुंबई, ठाणे आणि त्या परिसरात पैसा उरणार नाही. मुंबईची ओळख आर्थिक राजधानी अशी आहे, ती ओळख पुसली जाईल. त्यावरून सध्या राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.