
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मंगळवारी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. युवा नेते ओम शिंदे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनातून नूतन विद्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. महिलांसह युवक-युवती आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढती लोकसंख्या, नव्याने विस्तारलेल्या वसाहती आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरात प्रथमच कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा व्यासपीठ न वापरता केवळ नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले.
ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पाणीटंचाईमुळे घरगुती कामांपासून दैनंदिन जीवनापर्यंत अनेक अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी आंदोलकांनी केली.
मोर्चा नगर परिषद कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले आणि निवेदन सादर करण्यासाठी शिष्टमंडळाला आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
यानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करून सुधारणा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच यासंदर्भात लेखी आश्वासनही आंदोलकांना देण्यात आले.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी निश्चित मुदतीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा नेते ओम शिंदे यांनी दिला. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मलकापूरमधील हा पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा शहरातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारा ठरला असून, आता प्रशासन ५० दिवसांच्या आश्वासनानुसार कितपत प्रभावी पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.