"दोन वर्षांपूर्वी उठाव केल्यावर शंभुराज सर्वात..."; मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा 'तो' किस्सा
सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिवाळी संपताच प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडील यश आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे जनता कोणाला साथ देणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यास सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी पाटण येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शंभुराज देसाई यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
पाटणच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीत आपला जन्म झाला ही अभिमानाची बाब आहे. जेव्हा माझ्या जन्मभूमीमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा तयाचा आनंद आणि समाधान वेगळे असते. बाळसाहेब आणि शिवाजीराव देसाई यांचा लोककल्याणाचा वारसा घेऊन शंभुराज देसाई पुढे निघाले आहेत. ”
पुढे बोलताना मुखमंत्री शिंदे म्हणाले, “ही जनता तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. शंभुराज देसाई यांची हॅट्रिक झाली आहे आता चौकार बाकी आहे. करोंना काळामध्ये शंभुराज देसाई वणवण फिरला. लोकाना मदत करणारा आमदार कोणी असेल तर तो शंभुराज देसाई. त्यांचे काम बोलते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी काम करत आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभुराज देसाई. आम्ही दोन वर्षांपूर्वी उठाव केला नसतं तर तुम्हाला २,९०० कोटींचा निधी मिळाला नसता. पूर्वीचे सरकार हे बहिरे होते. नुसते घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून, फक्त कोमट पाणी प्या म्हणून सरकार चालवता नाही. त्यासाठी जनतेमध्ये जावे लागते.”
शंभुराज देसाई हाच आमचा आमदार
“शंभुराज देसाई हाच आमचा आमदार आहे असे या जनतेने ठरवले आहे. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई दोन पावले माझ्यापुढे होते. म्हणून मी त्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले. उठाव करताना शंभुराज देसाई सर्वात पुढे होते. त्यावेळेस त्यांनी कुठे चाललोय, लाय करतोय याबद्दल काहीही विचारले नाही. त्यांनी छातीचा कोट करून लढाई लढली आणि हेच पाटणचे पाणी मला दिसले. जो शब्द देतो, तो शब्द पाळणारा माणूस मला आवडतो. शंभुराज देसाईला घाबरायची गरज नाही कारण, त्याच्यामागे येडोबा आहे, नाईकबा आहे, भैरोबा आहे. ज्योतिबा आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामागे आहेत. म्हणून कोणी येउदेत, पाटणचा किल्ला शंभुराज देसाईच सर करणार”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.