
शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा! प्रशासनाचे दुर्लक्ष; पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
यवतमाळ शहरात गेल्या आठवडयात मुसळधार पाऊस आणि त्यापूर्वी डासांचा प्रकोप, पावसाळी आजार आणि डायरिया, मलेरिया सारखे आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून यवतमाळ शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. जीवन प्राधिकरणाकडून यवतमाळ शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत होता. यामुळे प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शहरात सध्या निळोना, चापडोह तसेच बेंबळा बांधमधून पाणीपुरवठा होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
तीन्ही प्रकल्पांतून पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध ठिकाणच्या फिल्टर प्लांटमध्ये आणले जाते. या पाण्याला व्यवस्थीत फिल्टर करुन नंतर शहरात पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. मात्र शहरात गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक स्तरावर काळजीपूर्वक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी गोधणी मार्गावरील रेल्वे कामामुळे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिणी फुटल्याने काही दिवसांसाठी पुरवठा बंद होता. दरम्यान सोमवारी सकाळी घरांमध्ये येणारा नळाचे दूषित असल्याने नागरिकांमध्ये आक्रोश व्यक्त होतांना दिसला.
जीवन प्राधिकरण विभागात काही नागरिकांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. शहरात पाणीपुरवठा करताना त्यात ब्लिचिंग पाऊडर तसेच इतर फिल्टर प्रक्रिया न करताच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे का, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दूषित पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी यवतमाळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्यासोबत मोबाइलवर संपर्क करण्यात आला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सद्या पावसाळ्याचे दिवस आहे, यात एखादी जलवाहिणी फुटल्याने पावसाचे पाणी त्यात घुसला असेल, यामुळे काही ठिकाणी गढुळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, ज्या ठिकाणाहून तक्रारी झाल्या, तेथील जलवाहिणींचे निरीक्षण करुन आम्ही दुरुस्ती करत आहो, अशी माहिती – गोपाळ जीवने, लेखाअधिकारी जीवन प्राधिकरण यांनी दिली आहे.