वसई – रवींद्र माने : एकाच घरात तीन फेरीवाल्यांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे. वसईच्या पश्चिमेकडील माणिकपुर चौक-नौपाडा येथे आशा सदन नावाची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली होती. सायंकाळी पाच वाजता माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर एक घर बंद असल्याचे आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना दिसून आले.
त्यामुळे या घराच्या काचेच्या खिडक्या तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता, तीन तरुणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी सर्व विच्छेदनासाठी पाठवले असून त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान गॅस गळतीतून या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, मयत झालेल्यांमध्ये मोहम्मद आझम, राजु आणि छुटाकाऊ (बाबू) यांचा समावेश आहे. हे तिघेही वसईतील आनंद नगर परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.