ठाणे – देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार लढत सुरु आहे. आज देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडत आहे. मात्र ठाण्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. याचे फोटो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केले आहेत. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा देखील साधला आहे.
लोकसभा निवडणूक EVM मशीनवरच घेण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने देखील निकाल दिला आहे. निवडणूकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या EVM मशीन ठाण्यामध्ये भंगारामध्ये पडलेल्या आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर हे फोटो देखील शेअर केले आहेत. ठाण्यामध्ये भंगारात जमा झालेले ईव्हीएम मशीन वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
Shameless @ECISVEEP
Why ru murdering #Democracy
Look what has happened in #Thane #Maharashtra pic.twitter.com/ZnHPGArZQl— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 26, 2024
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगारामध्ये जमा झालेले ईव्हीएम मशीन्स आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. 2014 सालापासून या वस्तू दादाजी कोंडदेव स्टेडिअमच्या स्टोअर रुममध्ये पडून असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लोकशाहीचा खून का करताय? ठाण्यात काय चाललंय बघा.’ जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टनंतर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.