
शिराळा / पराग शेणोलकर: शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची बॅटींग कायम सुरूच आहे. दहा दिवस पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. शनिवार सकाळी जलविद्युत प्रकल्प सुरू करून त्यातून ६२४ क्युसेक व लो लेवल गेट मधून ११३७ क्युसेक असा एकूण १७६१ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत येत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ५ जुलैपासून आतापर्यंत सलग दहा दिवस अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दहा दिवसात १२ टीएमसीने वाढला आहे. सध्या धरणात २३.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ६९.०४ अशी आहे.पाणी पातळी ६१४.९० मिटर झाली आहे. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच शुक्रवार सकाळी ८ ते शनिवार सकाळी ८ वाजेपर्यंत ९० मि.मी.सह एकूण ११४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही पाणलोट क्षेत्रातून १६ हजार २५० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळेच जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करून व लो लेवल गेटमधून
विसर्ग वाढविण्यात आल्याची व नदीकाठावरील गावानी सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनामार्फत आले आहे.