
matang
Matang samaj protest Partur: अनुसूचित जाती प्रवर्गाचे घटनात्मक उपवर्गीकरण तत्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने नगरसेवक बाबूराव हिवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून परतूर येथे मराठवाडा स्तरीय मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार परतूर यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चादरम्यान आयोजित सभेत अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांनी रोखठोक भाषणात सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, उपवर्गीकरणाचा विषय जिवंत ठेवण्यासाठी मातंग समाजासाठी मारायलाही तयार आहे, १ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास १ लाख लोक मुंबईवर धडकणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
आपल्या भाषणात सचिन साठे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने या मोर्चाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा विषय जिवंत ठेवण्यासाठी आणि मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला व मारायलाही तयार आहे. आज समाजाला हीन दर्जा दिला जात आहे, याचे खूप वाईट वाटते.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले, शाहू महाराज म्हणाले होते की, आरक्षण दिल्याशिवाय समाज सुधारणार नाही. त्याकाळी जसा काही लोकांनी विरोध केला होता, तसाच विरोध आजचे काही लोक करत आहेत. यावरून ते कोणाची अवलाद आहेत हे सिद्ध होते.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की प्रगत आणि अप्रगत जाती कोणत्या आहेत, जर येत्या १ ऑगस्टपर्यंत उपवर्गीकरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही, तर १ लाख लोक मुंबईवर धडकतील आणि जीआर सोबत घेऊनच परत येतील. त्यामुळे पोटराजांना हीनावणाऱ्या लोकांपासून सावध राहा, शांततेत राहा, आपला विजय निश्चित आहे.
इतर वक्त्यांनी नमूद केले की, समाजाच्या हितासाठीच मातंग समाज उपवर्गीकरणाची मागणी करत आहे. समाजात हजारो उच्चशिक्षित तरुण रोजगारापासून वंचित आहेत. मातंग समाजाला सतत दुय्यम स्थान दिले जाते, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपवर्गीकरण अत्यंत आवश्यक आहे. ज्या मातंग समाजाने फडणवीस यांना खुर्चीवर बसवले, तोच समाज त्यांना खाली उतरवू शकतो.
१ ऑगस्टपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास सर्व आमदारांसह लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जाईल, तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरात साप सोडण्याचे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. दिल्लीत झालेल्या लाठीहल्ल्याचा सभेत तीव्र निषेध करण्यात आला. समाजातील नेत्यांना बदनाम करून हा लढा कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानत नाहीत, आम्ही त्यांना मानत नाही, असे सांगत वक्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच रामदास आठवले व इतर नेत्यांनी समाजाला दाबून ठेवल्याचा आरोप केला.