सरकार उलथवण्याची भाषा चीड आणणारी
मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारविरोधात भाष्य केलं होतं. त्याचा समाचार आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ‘महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते आणि ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री बावनकुळे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा आरक्षणासह कोणत्याही मागण्यांसाठी संयम आणि सकारात्मक चर्चेचा मार्ग अवलंबावा. आम्ही सर्वांचे हक्क मांडण्यास मोकळीक देतो, पण अशा भाषा आणि धमक्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीत. चिथावणीखोर आणि अर्वाच्च भाषा टाळली पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, आंदोलन आणि मागण्या मांडण्याचा सर्वांना हक्क आहे. पण चिथावणीखोर आणि एकेरी भाषा वापरणे, विशेषतः आमच्या आया-बहिणी आणि नेत्यांच्या कुटुंबियांबाबत बोलणे कोणीही अजिबात सहन करणार नाही’.
तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानाची प्रशंसा केली. रात्रंदिवस अभ्यास करून, कायदे अभ्यासकांची मते घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी स्वतः आर्थिक-सामाजिक सर्वेक्षण केले, असे बावनकुळे म्हणाले.
वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही
महाराष्ट्र वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले.
जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी बीडमध्ये सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा देखील उल्लेख केला. यावरुन आता राजकारण तापताना दिसत आहे.