मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाबाबत (EC On NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar group) बाजूने निर्णय दिला असून शरद पवार गटाला (Sharad Pawar group) जोरदार धक्का दिला आहे. पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. महाभारतातील (Mahabharata) प्रसंगाचे दाखले देत रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील परिस्थितीचे वर्णन केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह वापरण्याचा अधिकार अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या या घटनेची तुलना महाभारतातील एका प्रसंगाशी केली असून आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर “महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या… pic.twitter.com/BNM65ZRHPM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 7, 2024
रोहित पवारांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
“महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला. नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला… कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते….”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय.. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!”