मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना संपातून माघार घेत कामावर रूजू होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या नंतर संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरचा पगार रोखण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जे कर्मचारी अजूनही संपावर अडून आहेत त्यांच्यावर मेस्मा लावण्यासंदर्भातचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्य आज कामावर हजर झालेल्या १९ हजार कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनवाढीनुसार पगार होत आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर आजपर्यंत हजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे. त्यात राज्यातील जवळपास १९ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार होत आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावे लागणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी संपाबाबत मेस्मा लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
राज्यात एसटी संपामुळे सामान्य गोर गरीबांचे तसेच शाळकरी मुले आणि ग्रामिण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत, याबाबत अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याची गरज असल्याचे मंत्रिमंडळासमोरच्या प्रस्तावात मंजूर झाल्यास सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबाबत कठोर कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मेस्मा लावल्यानंतर त्याचे कायदेशीर परिणाम काय होऊ शकतात? याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर महामंडळानं मेस्मा कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटिशीविना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते. तसेच कायद्यानुसार, एक वर्षाचा कारावासही होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत महामंडळाने दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर २ हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई केली आहे. दुसरीकडे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने यानंतरच्या काळात दगडफेक करणारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.