केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची हार
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत हा मोदींच्या विकासाचा विजय असून, केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची ही हार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. विजयावर त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेल्या बहुमताबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानत या निवडणूक निकालाचे स्वागत केले.
महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलित समाजातील मतदारांनी भाजपप्रणित एनडीएला बहुमतांचा कौल दिला असल्याची ग्वाही देत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने होत आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बांधली जात आहेत. तर सर्वच क्षेत्रात देशाचा विकास होत आहे. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अतूट विश्वास आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्लीतिल जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत देऊन मोदींवरील विश्वासावर शिक्कामोर्तब केलेले आहे, असे सांगत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन पुकारुन नवे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. मात्र, भ्रष्टाचाराविरुध्द उभे राहिलेले केजरीवाल झपाट्याने भ्रष्टाचारात गुरफटत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.
शुध्द पाणी न दिल्याने पराभवाचे पाणी पाजले
दरम्यान, दिल्लीतील जनतेला केजरीवाल न्याय देऊ शकले नाहीत. दिल्लीतील जनतेला पिण्याचे शुध्द पाणीही ते देऊ शकले नाहीत. आप सरकारचे कामकाज ही खराब ठरले, त्यामुळे दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना पराभवाचे पाणी पाजले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
पंतप्रधानांकडून जनतेचे आभार
दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने 27 वर्षांनी कमबॅक केले आहे. 2020 मध्ये 8 जागा जिंकणाऱ्या भाजपने या निवडणुकीत थेट 48 जागा जिंकल्या आहेत. 10 वर्षांच्या केजरीवालांच्या सत्तेचा गड भाजपने भेदला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. दिल्लीत आता भाजपचे सरकार येणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पंतप्रधान मोदी यांनी देखील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन विजय साजरा केला आणि कार्यकर्त्यांना संबोधित देखील केले.