वर्धा : कुठल्याच जातीचा जयघोष करायला नको. जयघोषच करायचाच असेल तर संविधानाचा करावा, छत्रपती शिवाजी महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा करावा. या महापुरुषांचा वैचारिक वारसा आम्हा सर्वांचाच आहे. हा वारसा जपतानाच त्यानुसार आपले आचरण असले पाहिजे, असे मत ‘सैराट‘फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सामाजिक संघटनांच्या वतीने आयाजित सत्कार समारंभाला उत्तर देताना व्यक्त केले.
पुढे बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, शाळेत असताना मला मास्तरांनी विचारले होते की, तुला कोणता ऋतू आवडतो. मी उन्हाळा असे उत्तर दिले होते. माझे उत्तर ऐकून सर्वांना हसायला आले. पण उन्हाळ्याची सकाळ आणि संध्याकाळ फार सुंदर असते. उन्हात-संघर्षात तावून सलाखूनच माणसे घडतात, पुढे जातात.
[read_also content=”लग्नाच्या १२ व्या दिवशी त्या युवकावर काळाचा घाला, भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-12th-day-of-the-marriage-the-young-man-was-killed-in-a-tragic-accident-nraa-264473.html”]
मी फिल्म मेकिंगमध्ये अपघाताने आलो. आज जे मी मांडतो, ते तुम्हा सर्वांना आवडते, याचे भारी वाटते. नागपुरात मी नेहमीच येतो. वर्ध्यात मी पहिल्यांदाच आलो. या जिल्हयाला ऐतिहासिक वारसा आहे. येथे मित्रांना भेटण्याकरिता आलो. त्यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन माझा जो सत्कार केला, तो उत्साह वाढविणारा, उभारी देणारा आहे. मी चार चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील दोन व-हाडी भाषेत आहेत. या भाषेवर माझे प्रेम आहे. ‘झुंड’ हा चित्रपट नागपुरी भाषेत आहे. या चित्रपटाविषयी, त्यातील भाषेविषयी मला जगभरातून प्रतिसाद, शुभेच्छा येत आहेत. आपण सर्वांनी मला जे प्रेम दिले, ते स्मरणात राहणारे असून, या शहरात मी पुन्हा येईल, अशी ग्वाही नागराज मंजुळे यांनी यावेळी दिली.
[read_also content=”कॅनडा फ्लाईंग अकादमीचा पाच लाखांचा कर थकीत, ग्रामपंचायतीने बजावली नोटीस https://www.navarashtra.com/maharashtra/canada-flying-academy-pays-rs-5-lakh-tax-notice-issued-by-gram-panchayat-nraa-264264.html”]
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नागराज मंजुळे यांचा जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सुतमाला व चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांनी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर सामाजिक संस्कार अधिक चांगल्या पध्दतीने रुजविणे सोपे असल्याचे ते म्हणाले. फॅन्ड्री, नाळ, सैराट या चित्रपटाच्या निर्मितीबाबतही त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाळ या चित्रपटाचे चित्रिकरण विदर्भात झाले. येथे अनेक जिल्ह्यांत चित्रपटासाठी चांगले लोकेशन असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.






