सातारा : जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील जनतेची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून धरणाबाबत येत्या दहा दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, बबनराव बेलोशे, राघव बिरामणे, नाना जांभळे, सागर धनवडे, बाजीराव सुर्वे, सुभाष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यमान अधिक असले तरी पावसाळयात वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे ऐन उन्हाळयात फेबुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ग्रॅव्हीटीने मिळणारे पाणी पूर्णत: आटते तसेच पाण्याचा अन्य कोणताही स्त्रोत उपलब्ध होत नाही. त्यामुळे बोंडारवाडी धरण होणे अत्यावश्यक आहे.
राज्य शासनाने पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी शिल्लक असलेले पाणी देण्याबाबत औंध व अन्य ठिकाणी दिलेल्या मंजूरीच्या धर्तीवर बोंडारवाडी प्रकल्पास मंजूरी देण्यात यावी, अशी आमचा मागणी असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात यावी. बोंडारवाडी प्रकल्पाबाबत येत्या १० दिवसात शासनाने सकारात्कम निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.