
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार ‘फिल्डिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. सोयीच्या विभागात बदली मिळवण्यासाठी काही अधिकारी दबावतंत्र, ‘सेटिंग’ आणि प्रभावाचा वापर करत आहेत. यामुळे पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याने नियमांना बगल देत थेट जमीन व मालमत्ता विभागात बदली मिळविल्याची माहिती पुढे आली आहे. या बदल्यामागे प्रशासकीय प्रक्रिया न पाळता ‘जुगाड’ लावल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होत आहे.
पीसीएनटीडीएचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन केले होते. संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला कनिष्ठ अभियंता म्हणून अभियांत्रिकी विभागात काम पाहिले. त्यानंतर काही काळ अतिदक्षता निर्माण विभागात बदली झाली; मात्र तेथूनही बाहेर पडत त्यांनी पुन्हा ‘मलईदार’ विभाग गाठल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, १४ मार्च २०२४ रोजी शासनाने ६.२५ टक्के जमीन परतावा संदर्भात अध्यादेश काढला. त्यानंतर जमीन व मालमत्ता विभागाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले. या पार्श्वभूमीवरच संबंधित अधिकाऱ्याने या विभागात बदली मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. अखेर १५ जानेवारी २०२५ रोजी अंतर्गत बदल्याचा आदेश निघाला आणि ७ जुलै २०२५ रोजी बदली अधिकृतपणे अमलात आली.
परतावा प्रक्रियेवर संशयाची छाया
दरम्यान, ६.२५ टक्के जमीन परतावा प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. संबंधित फाईल्स तयार करण्याची जबाबदारी याच कनिष्ठ अभियंत्याकडे आहे. त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारवाईचा प्रश्न अनुत्तरित
विभागप्रमुखांकडून विरोध असतानाही अशा बदल्यांना मंजुरी कशी मिळते. याबाबत प्रशासनातच कुजबूज सुरू आहे. महानगर आयुक्त या प्रकरणात ठोस भूमिका घेतात का? आणि संबंधितांवर कारवाई होते का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दबावतंत्राचा वाढता प्रभाव
अंतर्गत बदल्यांसाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. काही अधिकारी सोयीच्या विभागात बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे उघड होत आहे., यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे.
मुळशी विभागात तक्रारींचा पाढा
मुळशी विभागातील कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. एक अधिकारी गेल्या सात वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत असल्याची बाब विशेष चर्चेत आहे. संबंधित अधिकारी बदलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.