
raj thackeray reaction on Ratan Tata Bharat Ratna
मुंबई : उद्योगरत्न रतन टाटा हे अनंतामध्ये विलीन झाले आहेत. देशभरातून अतिशय भावनिक निरोप देण्यात आला. राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्या रतन टाटा यांना मरणोत्तर सन्मान दिला जात आहे. राज्यातील उद्योग भवनाचे नाव रतन टाटा उद्योग भवन असे करण्यात आले असून पुरस्कारचे नाव देखील बदलण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून रतन टाटा यांना भारतरत्न द्या अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत बैठक घेत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या राज्य सरकारच्या मागणीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामधून राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’ सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !”
“काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न च नाहीत तर काय मग अजून ? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.”
पुढे ते म्हणाले की, ” तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे,” असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.