
Sanjay Shirsat (Photo Credit- X)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर, आमदार-खासदारांच्या फुटी आणि सध्याच्या राजकारणावर केलेल्या परखड टीकेनंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच. सध्या जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आहे,” अशी टीका केली होती. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “राज ठाकरे यांनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केलं, तेच समजत नाही. तुमच्या पक्षात असतील तर ते वाघ आणि दुसऱ्या पक्षात गेले की त्यांना वेश्या म्हणणं हे चुकीचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक पक्षात मतभेद असतात. पक्षश्रेष्ठी वेळ देत नसतील, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या जात नसतील, तर त्यांनी कायम दबूनच राहावं का? गद्दार, खोके घेतले अशा आरोपांपेक्षा स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि नेते टिकवण्यात अपयश का आलं, याचाही विचार झाला पाहिजे.”
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप महायुतीवर जोरदार टीका केली होती. खासदार आणि आमदारांच्या बंडखोर गटांवर टीका करताना ते म्हणाले, “सध्या प्रश्न ‘खरेदी कोण करतंय’ हा नाही, तर ‘विकले जाण्यास कोण तयार आहे’ हा आहे. जर ते देहविक्रीला तयार असतील, तर खरेदीदार नेहमीच मिळतील. राजकारण्यांना आपण कशा प्रकारचा पायंडा पाडत आहोत, याची जाणीव नाही. आपण देशाला कोणत्या दिशेने नेत आहोत?”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या अलीकडील विधानांवरही संजय शिरसाट यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, “अमोल कोल्हे हे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी केलेल्या विधानामागे पक्ष नेतृत्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे. रोहित पवार जे बोलतात, तेच शरद पवार यांचं अंतिम मत असतं असं नाही. अनेकदा वेगळी भूमिका घेतली जाते.”
शिरसाट यांनी पुढे दावा केला की, “बदलाचे वारे वाहू लागले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात. त्यामुळे रोहित पवारांपेक्षा अमोल कोल्हे यांच्या मताला अधिक महत्त्व आहे.”
उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारा, असं म्हटलं नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.