
राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी सज्ज झाले आहे. रविवार (दि.२२) सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली असून, प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या अनुषंगाने तालुका समन्व्यक व केंद्र संचालकांना आवश्यक सूचना केल्या आहेत.
यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, नाशिक जिल्ह्यात ३९३ परीक्षा केंद्रवार ५५ हजार ३२२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षेचा पाया रचण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होईल. पेपर- १ प्रथम भाषा, गणित आणि पेपर-२ हा तृतीय भाषा व बुद्धिमतेचा राहणार असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा राहील. पेपर १ हा ११ वाजता सुरु होणार असला तरी विद्यार्थ्यांनी १० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे अपेक्षित आहे.
हेदेखील वाचा : वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे
पेपर-१ हा ११ ते १२.३० तर पेपर-२ हा २ ते ३.३० या वेळेत घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता शांततेत परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
असे आहे नियोजन…
– पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) २२२ परीक्षा केंद्र, ३३,७२२ विद्यार्थी
– पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) १७१ परीक्षा केंद्र, २१,६०० विद्यार्थी
– परीक्षेसाठी एकूण ५५ हजार ३२२ विद्यार्थी प्रविष्ट
– परीक्षेचा नियंत्रणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी १ संपर्क अधिकारी
सध्या दहावीची परीक्षाही सुरु
राज्यात दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून, यंदा ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक कडकपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा बुधवार, १८ मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.