फोटो सौजन्य - Social Media
बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे तपासात समोर आले असून या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित परीक्षा केंद्रावरील २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही घटना वाशिम जिल्ह्यातील टो-जुमडाफाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्र क्रमांक ०९०६ येथे घडली. सोमवारी दुपारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना सुमारे २.३० वाजता भरारी पथकाने अचानक पाहणी केली. तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी एकाच पद्धतीने उत्तरे लिहिल्याचे आढळले. उत्तरपत्रिकांची सविस्तर छाननी केल्यानंतर ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे अक्षरशः जुळत असल्याचे स्पष्ट झाले. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्येही समान चुका आणि एकसारख्या खूणा आढळल्यामुळे संशय अधिक गडद झाला.
भरारी पथकाच्या अहवालात परीक्षा केंद्रावरील अपुऱ्या सुविधा, सीसीटीव्ही फुटेजमधील निरीक्षणे तसेच काही कर्मचाऱ्यांकडे सापडलेले मोबाईल फोन यांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही उत्तरपत्रिकांवर पेन किंवा पेन्सिलने केलेल्या विशिष्ट खूणा आढळून आल्याने ही कॉपी नियोजनपूर्वक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जात आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने तात्काळ २६ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षाधिकारी मंगल पुरे यांनी सांगितले की, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही परीक्षा केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असून परीक्षेची पारदर्शकता आणि शैक्षणिक प्रामाणिकता अबाधित राखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.






