
मुंबई – आपल्या मुंबई महानगरीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव हा अतिशय उत्साहाने व शिस्तबद्धरित्या साजरा होतो. बृहन्मुंबईसारख्या लोकसंख्येची घनता अधिक असणा-या व दाटीवाटीने वसलेल्या महानगरात शिस्त आणि पर्यावरण पूरकता जपत मोठ्या प्रमाणात घरगुती व सार्वजनिक स्तरावर साजरा होणारा गणेशोत्सव हा निश्चितच अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी काढले. त्या आज बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित श्री गणेश गौरव स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[read_also content=”मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, फितूर झालेल्या साक्षीदारांची संख्या २९ वर https://www.navarashtra.com/maharashtra/malegaon-blast-case-number-of-exonerated-witnesses-rises-to-twenty-nine-345140.html”]
आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे या उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, गेल्या २ गणेशोत्सवांदरम्यान ‘कोविड’च्या साथीमुळे आपण मर्यादित पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना गणेश भक्तांनी व श्रीगणेश मंडळांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला व चांगले सहकार्य केले. तसेच यंदा कोविडची साथ नियंत्रणात आल्यानंतर केलेल्या आवाहनांना देखील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांप्रती आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमंडळ २ चे उपायुक्त श्री. रमाकांत बिरादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान बिरादार यांनी बृहन्मुंबईतील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये नमूद करतानाच श्रीगणेश गौरव स्पर्धा आयोजना मागील हेतू देखील सांगितला. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे उभारण्यात येणा-या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, पर्यावरण जनजागृती संदेश आणि नागरी सेवा-सुविधांविषयक संदेश जनसामान्यांपर्यंत अधिकाधिक प्रभावीपणे पोहोचण्यास प्रोत्साहन मिळावे, या प्रमुख हेतुने ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे श्री. बिरादार यांनी आवर्जून नमूद केले.
• प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)
पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३
• द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)
युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई – ९५
• तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)
स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३