
‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार, खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका
खासदार म्हस्के यांनी सांगितले की, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाठा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, उबाठाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाठाने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, असा दावा खासदार म्हस्के यांनी केला. पक्षातील नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या उबाठाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत, असे खासदार म्हस्के म्हणाले. उबाठाचा खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
राऊतांच्या कटकारस्थानामुळेच उबाठा पक्ष मृतावस्थेत गेलाय, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे, असे ते म्हणाले. उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरिक्षा द्यावी लागतेय, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.