
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी होत आहे. यामध्ये आता शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला म्हणूनच महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचे म्हटले आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे मुद्दे खोडून काढण्यास सुरुवात केली आहे. हे मुद्दे खोडताना नवे मुद्दे मांडत साळवे यांनी राज्यातील सत्ता संघर्षाचा घटनाक्रमच सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. अजय चौधरी यांची गटनेते पदाची निवड बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा दावाही हरीश साळवे यांनी केला.
शिंदे यांचं सरकार घटनात्मक
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केला. एकनाथ शिंदे हे राज्याचे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण शिंदे यांनी कायदेशीरपणे बहुमत सिद्ध केलं आहे. त्यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता. शिंदे गट आणि भाजपकडे बहुमत असल्यानेच ते मुख्यमंत्री झाले, असेही साळवे यांनी सांगितले.
…म्हणून इतर सर्व मुद्दे निरर्थक
उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे इतर सर्व मुद्दे निरर्थक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरच एकनाथ शिंदेंनी बहुमताचा दावा केला. सरकार कोसळण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.