
वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन
पंढरपूर, (वा.) आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षणाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण गुरुवारी वाखरी येथील बाजीराव विहीर परिसरात भक्तिमय वातावरणात पार पडले. याचवेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगणही उत्साहात पार पडले. लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली… माऊली’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदा रिंगण सोहळ्यासाठी नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने काही काळ नियोजनाचा ताण निर्माण झाला. ढकलाढकलीमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासन आणि सेवेकऱ्यांच्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आली.
भंडीशेगाव येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी बाजीराव विहीरकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील मुक्कामानंतर उभ्या रिंगणासाठी वाखरीत दाखल झाला. पालखी मार्गावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यासाठी सकाळपासूनच महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश आणि देशाच्या विविध भागांतून आलेले वारकरी दिंड्यांसह बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते.
हातात टाळ, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखी हरिनाम असा भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला. सायंकाळी चोपदारांनी रिंगणाची सुरुवात केली. पालखी चौथऱ्याभोवती आकर्षक रांगोळी सजविण्यात आली होती. टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, हंडेकरी, तुळशीकरी अशा मानकऱ्यांनी रिंगणस्थळाला फेऱ्या मारत वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर माऊलींची पालखी आणि मानाचा अश्व रिंगणस्थळी दाखल झाला. धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारानंतर मानाचा अश्व गोल रिंगणासाठी मैदानात सोडण्यात आला. हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात अश्वाने वेगाने रिंगण पूर्ण केले. अश्वाच्या प्रत्येक फेरीनंतर हरिनामाचा गजर अधिकच वाढत गेला. रिंगणानंतर वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर नृत्य, फुगड्या, अभंग आणि हरिपाठातून आनंद व्यक्त केला.
आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यात पंढरपूरजवळील वाखरी नगरीत गुरुवारी विविध संतांच्या पालख्यांचे आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांमुळे वाखरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. ग्रामस्थ, विविध संस्था आणि सेवाभावी मंडळांनी पालख्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले.
वाखरीतील शेवटचा मुक्काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. चंद्रभागा स्नान करून विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी वारकरी आतुर झाले आहेत. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा शनिवारी २५ जुलै रोजी होत असून, श्री क्षेत्र पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी जमली आहे. सध्या पंढरपुरात तीन लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले असून, विठ्ठल दर्शनासाठी ३० हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी २४ तासांचा कालावधी लागत आहे, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. विठ्ठल दर्शनाची रांग गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत गोपाळपूरपुढील स्वेरी कॉलेजपुढे पोहोचली होती. दर्शनाचा वेग प्रति मिनिट ३२ ते ३५ भाविकांचा आहे. व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांबाबत भाविकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. प्रशासनाने आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या बुधवारी पंढरपूर तालुक्यात दाखल होणार आहेत. मंदिर परिसरातील ६५ एकर मैदानात आतापर्यंत ६५० हून दिंड्यांचे बुकिंग झाले आहे. बुधवारी एआयने दर्शनरांगेत १० हजार भाविक असल्याची नोंद केली होती. ही रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली होती.