
सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी
सेलू, (ता. प्र.). शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम तब्बल २ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रखडलेल्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या नाल्यांच्या कडेला भराव न टाकल्याने शनिवारी दुपारी २ म्हशी उघड्या नालीत अडकून जखमी झाल्याची घटना घडली. नागरिकांनी मोठ्या शर्थीने या म्हशींना बाहेर काढले.
रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान शहरातील मुख्य मार्गालगत सिमेंटच्या नाल्यांची उभारणी करण्यात आली. मात्र नाल्यांच्या दोन्ही बाजूंना आवश्यक भराव टाकण्यात आलेला नाही. गत २ महिन्यांपासून नाल्यांच्या खोल कड़ा उघड्याच असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अखेर या निष्काळजीपणाचा फटका २ म्हशींना बसला. दोन्ही म्हशी नालीत अडकून जखमी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी दोन्ही जनावरांना बाहेर काढले. मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे, मातीचे ढिगारे आणि अपूर्ण नाल्यांची कामे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार वारंवार घसरून अपघातग्रस्त होत असून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांनाही रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनत असून चिखल, साचलेले पाणी आणि उघड्या नाल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांच्या मते, इतका गंभीर प्रश्न निर्माण होऊनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाकडूनही कामाला गती देण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील विविध सामाजिक संघटना रस्ता आणि राजकीय पक्षांनी या प्रश्नावर मौन बाळगल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे रुंदीकरणाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण करण्याची, उघड्या नाल्यांवर त्वरित भराव टाकण्याची आणि निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रुंदीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, उघड्या नाल्यांच्या कडेला त्वरित भराव टाकून सुरक्षितता सुनिश्चित करावी, निष्काळजी कंत्राटदारावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, पावसाळ्यात तात्पुरती सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी जबाबदारी निश्चित करावी.
रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे शहरातील मुख्य मार्गावर खड्डे चिखल आणि उघड्या नाल्यांचा विळखा निर्माण झाला आहे दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होण्याच्या घटना वाढत असून पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शनिवारी २ म्हशी नालीत अडकल्याच्या घटनेने परिस्थिती किती गंभीर बनली आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.