
यंदा पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान नोंदवण्यात आले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा घटला आहे. विशेषतः बारामतीमधील निवडणूक राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीमध्ये ५४.९० टक्के इतके निचांकी मतदान झाल्याने, या उदासीनतेचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार, यावर आता गणिते मांडली जात आहेत. मावळ, भोर, शिरूर आणि खेड यांसारख्या तालुक्यांमध्ये मात्र मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखवत मोठा प्रतिसाद दिला आहे.
या निवडणुकीत पक्षीय समीकरणे, स्थानिक प्रश्न आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निकालाचा परिणाम केवळ जिल्ह्यावरच नव्हे, तर आगामी काळातील राज्याच्या राजकारणावरही होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड मजबूत ठेवणार की शिवसेना-भाजप युती सत्तेची नवी समीकरणे मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठे राजकीय फेरबदल झाले आहेत. अनेक ठिकाणी उदयाला आलेल्या नव्या नेतृत्वामुळे यंदाचा निकाल चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.
चक्क ढाब्यावर दिसून आल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीसह शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक
यंदाच्या प्रचारात ग्रामीण भागातील पाणीटंचाई, खराब रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगाराचे प्रश्न केंद्रस्थानी राहिले. मात्र, प्रत्यक्ष मैदानात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक गटबाजी, नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा आणि व्यक्तीकेंद्रित लढतीच निर्णायक ठरल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभांऐवजी उमेदवारांनी थेट मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिल्याने निकालाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
याशिवाय जिल्ह्यात कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार की सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन नवीन आघाडी आकाराला येणार, याचाही फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. जिल्ह्याच्या सत्तेची चावी पुन्हा कोणाकडे जाते, यावर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.