म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून त्यानंतर मंत्रिपदाची नावं निश्चित होतील, अशी चर्चा होती. फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज्यात उलट सुलट चर्चा सुरू असताना, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचं दिल्लीला जाण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं. मंत्रिपदासाठी आमची यादी आधीच तयार असल्याने आम्हाला कुठेही जाण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाची यादी दिल्लीत ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही निर्णय बाकी असेल, त्यामुळे ते गेले असतील, असंही ते म्हणाले.
शिवसेनेत कोणीही नाराज असण्याच काही कारण नाही. कारण शिवसेनेत कोणाला मंत्री पदाची संधी मिळते, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपावलेला आहे. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्याकडे अडीच वर्षांचा कोणताही फॅामुर्ला ठरलेला नाही. तसंच 13-14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. खात्यावरुन तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. इतर कोणालाही या बद्दल माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
महायुतीत सरकारचा शपथविधी होऊन जवळपास आठवडा उलटला आहे. तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातचा निर्णय झाला नाही. कोणत्या पक्षाला किती खाती मिळतील याचं गणित अद्याप समोर आलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांना संधी देण्यात यावी, कोणत्या पक्षाला किती खाती दिली गेली पाहिजे. बाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्ष श्रेष्ठींसोबत दिल्ली बैठक होत आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय त्यांच्याकडे होतं. आता एकनाथ शिंदे गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण, भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.