रिक्षातून पडल्याने महिलेचा मृत्यू; पोटची तिन्ही मुलं झाली पोरकी
यवतमाळ : राजूर कॉलरी गावात धावत्या ऑटोरिक्षातून पडून एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास वणी तालुक्यातील पळसोनी फाट्याजवळ घडली. रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव असून, त्या राजूर (कॉलरी) येथील रहिवासी होत्या.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने रंजना या ऑटोरिक्षातून खाली पडल्या, असे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी ऑटोरिक्षाचालक रहेमत रहिम खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. रंजना या त्यांच्या मुलांच्या एकमेव आधार होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे तिन्ही मुले पोरकी झाले आहेत. रंजना जंगमवार (45) या लालपुलिया परिसरातील एका कोलडेपोमध्ये मजुरी करायच्या. रविवारी सकाळी त्या कोलडेपोमध्ये कामाला गेल्या होत्या.
सायंकाळी काम संपवून त्या गावी परत जाण्यासाठी एका ऑटोत बसल्या. दरम्यान, राजूर रोडवरील सोनामाता मंदिराजवळ ऑटोचालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ऑटोत बसलेल्या रंजना खाली पडल्या. त्यांच्या मेंदूला जबर इजा झाल्याने त्यांना तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आरोपी ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास वणी पोलिस करीत आहेत.
रंजना यांच्या पतीचे काही वर्षांआधी निधन झाले होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत त्यांनी मुलांचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. काबाडकष्ट, मजुरी करून त्या आपल्या मुलांचे शिक्षण करीत होत्या. त्यांचे तिन्ही मुले शिकत आहेत. आई हेच या तिघा अपत्यांचा आधार होती. मात्र आईच्या मृत्यूमुळे त्यांची मुले पोरके झाली असून त्यांचा आधार हरपला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.