
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा: खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपशाशी संबंधित आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुडालेली बोट बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुंजाळा येथील 60 वर्षीय राजेंद्र आनुजी इलग यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नदीपात्रातील सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि रेती उपशावर नियंत्रणाच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. माहितीनुसार, खापरखेड लाड परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रात बुडालेली बोट बाहेर काढण्यासाठी काही मजूर पाण्यात उतरले होते. यावेळी राजेंद्र इलग हे पाण्याखाली गेल्यानंतर वर आले नाहीत. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे 24 तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बोटीखाली अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
या प्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नदीपात्रातील रेती उत्खननादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खडकपूर्णा नदीपात्रातील कथित अवैध रेती उपशाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी, निवेदने, आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नदीपात्रातील बेकायदेशीर उत्खनन आणि त्यातून निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.