(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या काही दिवस आधी ज्योती यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महासंगम स्पेशल भागाचे शूटिंग पूर्ण केले होते.१० ऑगस्ट रोजी काही दिवसांची सुट्टी काढून त्या पुण्यात गेल्या आणि त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘पूर्णा आजी’ ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजीच्या पात्राविषयी प्रेक्षकांनी असंख्य कमेंट केल्या आहेत. मालिकेत त्यांची जागा इतर कोणत्याही अभिनेत्रीला देऊ नये, अशी मागणी प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली आहे.
पूर्णा आजीविषयी प्रेक्षकांच्या भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत असताना, त्यांची मुलगी पोर्णिमा पंडित हिने तिच्या आईला प्रेक्षकांकडून कायम मिळत आलेल्या या प्रेमाविषयी सगळ्यांचे आभार मानले आहे. आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्योती यांच्या निधनानंतर लेकीने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली. ज्योती चांदेकरांचा हसरा फोटो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे स्क्रिनशॉट शेअर करत पोर्णिमाने ही पोस्ट लिहिली.
किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ
पोर्णिमाने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई). मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र-मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं, की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दीवाले आणि नाटक-सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ताच नसतो असं माझी आज्जी म्हणायची. तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही.’
पोर्णिमाने पुढे लिहिले की, ‘पण आई आता गेली, अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण.’
‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
‘ठरलं तर मग’ मालिकेत ज्योती यांनी साकारलेल्या ‘पूर्णा आजी’च्या पात्राच्या जागी इतर कोणाला घेऊ नका अशी मागणी अजूनही प्रेक्षकांकडून होते आहे. याविषयी पोर्णिमाने लिहिले की, ‘अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली, असा कलाकार होणे नाही… अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं, किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली. आता पटतंय, कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर-पंडित, एक रंगकर्मी, कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली, रुबाबात राहिली, माणसं जोडली, नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या, आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे, मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार.’ असे लिहून पोर्णिमाने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
पोर्णिमाने शेअर केलेली ही पोस्ट तेजस्विनीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजीच्या पात्राविषयीची मागणी लक्षात घेता, प्रेक्षक एखाद्या पात्राशी किती जोडले जातात याचीच जाणीव होते. तसेच आता पोर्णिमानंतर प्रेक्षकांचे तेजस्विनीही काही प्रतिक्रिया देते का याकडे लक्ष वेधले आहे.