
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गोवर्धन आणि आनंदी यांच्या आयुष्यात दडलेलं पाप स्वामी उघड करतात. दत्तक घेतलेल्या मुलीवर केलेल्या अन्यायामुळे त्यांच्या आयुष्यात ओढवलेल्या संकटांचं खरं कारण समोर येणार आहे. त्याचवेळी अंबिकेला पडलेलं संकेतस्वरूप स्वप्न तिला आणि निरंजनला गोवर्धनच्या मदतीसाठी धाव घ्यायला प्रवृत्त करतं. दरम्यान, मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते. हे सगळं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.
होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा
राजांच्या साक्षीने, होळी पौर्णिमेच्या दिवशी स्वामी अंबिका आणि मुकुंद या दोघांनाही स्वतःचं चित्र रेखाटण्याची संधी देतात. “नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक आहे,” या स्वामींच्या वचनानंतर खऱ्या अर्थाने थराराला सुरुवात होते. अंबिकेच्या भक्तिभावातून साकारलेलं चित्र दिव्य प्रकाशाने उजळून निघतं, जिवंत भासू लागतं आणि स्वामींचा आशीर्वादित आवाज घुमतो, “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” मुकुंदची नुसती नक्कल उघडी पडते; तर अंबिकेच्या कलेतून तिचं समर्पण आणि श्रद्धा सिद्ध होते.
गोवर्धन आणि आनंदी दरबारात येऊन संपूर्ण सत्य मांडतात आणि खोट्याचा अंत होतो. राजेसाहेब अंबिकेला कलेची खरी वारसदार घोषित करतात. या होळिका दहनात अंबिका केवळ अन्यायाविरुद्ध उभी राहत नाही, तर आपल्या मनातील शंका-कुशंका देखील दहन करते. स्वामी अंबिका-निरंजनला पुत्ररत्नाचा आशीर्वाद देतात. मात्र कलेला संघर्षाचा शाप असल्याची भविष्यसूचना देत आगामी वळणांची चाहूलही देतात. श्रद्धा, समर्पण आणि सत्याचा विजय साजरा करणारा हा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.