
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला तसेच प्रकाशकाला धमकीही दिली. या वादानंतर राज्यात आणखीन एका वादाची पालवी फुटली आहे. धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
नागपूरमधील जामठा परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींकडे जाऊन राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केल्याचे विधान केले. या वक्तव्यामुळे विविध क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. मुळात, अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे, तसेच दरम्यान त्याने भिवंडी येथे स्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. यादरम्यान, त्याला धीरेंद्र शास्त्रींच्या त्या विधानाबाबत विचारले गेले असता त्याने “महाराजांच्या बाबतीत केले गेलेले आक्षेपार्य विधाने खपवून घेतले जाणार नाहीत” असे विधान केले. तसेच त्याला या प्रकाराबद्दल काही माहिती नसल्याचेही सांगितले.
या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे धीरेंद्र शास्त्री यांना फटकारले. “ कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे. प्रौढप्रतापपुरंदर… क्षत्रियकुलावतंस. सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रितेश देशमुखच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चर्चेला आणखी उधाण आले असून, अनेक शिवप्रेमींनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवरही प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणामुळे इतिहास, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी राजा शिवाजी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
विशेष म्हणजे, या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत असून दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ मे रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.