जिया खान प्रकरणावर सूरज पांचोलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, थेट आरोपांचाच पाढा वाचला
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणामध्ये अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय सूरजवर अभिनेत्रीवर हल्ला केल्याचाही आरोप केला जात आहे. ज्यावेळी जियाने आत्महत्या केली त्यावेळी ती सूरजसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अशा परिस्थितीत जियाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात सूरजचे नाव येत राहिले, तो त्यात अडकू लागला. या प्रकरणात त्याला जवळजवळ एक दशक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला. दरम्यान, आता तो याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याने असेही म्हटले की, वयाच्या २० व्या वर्षी त्याला दहशतवाद्यासारखे वागवले गेले.
नुकतंच सूरज चव्हाणने वरिंदर चावलाच्या टीमसोबत संवाद साधला होता. त्यावेळी संवाद साधताना त्याने सांगितले की, “जेव्हा मला मीडियाने खलनायक बनवलं होतं, तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचाच होतो. आमच्यातल्या अयशस्वी नात्यामुळे मला मीडियाने ‘दहशतवाद्यासारखे वागवले गेले.’ सूरज पांचोलीने या एकतर्फी कथेवर टीका केली आणि असा दावा केला की, कोणीही कथेची दुसरी बाजू पाहिली नाही किंवा घटनेचे नेमके कारण काय आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. त्याने असेही म्हटले की, त्याच्याविरुद्ध फक्त ‘घाणेरडे आरोप’ करण्यात आले.
मुलाखतीदरम्यान, सूरज पांचोली पुढे म्हणाला की, “सततच्या आरोपांमुळे मला फार वाईट वाटत होतं. माझ्यावरील डाग पुसण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खटल्याच्या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेतून जाणे. मला याची मोठी किमत मोजावी लागली असं मला वाटतं. कारण केस चालवणे सोपे नसते, विशेषतः जे मीडियाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी.” सूरजने पुढे सांगितले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात जातोय. कधी कधी तर आठवड्यातून दोनदा तिनदा मी तिथे जायचो. तर, कधीकधी संपूर्ण आठवडाही जायचो.”
स्वत: ला WhatsApp ला पाठवला मेसेज अन् संपवलं जीवन, प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या
याबरोबरच सूरज पांचोलीने असेही सांगितले की, “जिया खानच्या घरी सापडलेल्या पत्रांच्या आधारे मला अटक करण्यात आली. पण, नंतर न्यायालयाने ते बनावट घोषित केले. मग मला या प्रकरणी सुरुवातीलाच का अटक करण्यात आली ? असा मला प्रश्न पडला. मी आता बोलण्याची आणि सांगण्याची हीच योग्य वेळ मानतो, कारण आता लोकं माझं ऐकण्यास तयार आहेत. मला अजूनही धक्का बसला आहे की, या प्रकरणात मला कोणी फसवलं तर नाही ना?” मुलाखती दरम्यान सूरजने, वडिलांचे द्वेष करणारे लोकंही मला फसवू शकतात, अशी शक्यता वर्तवली. यादरम्यान सूरजने कोणाचेही नाव घेतले नाही.
सूरज पांचोली सध्या त्याच्या बॉलिवूडमधील पुनरागमनामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. त्याच्याबरोबर सुनील शेट्टीही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.