"बाणेदारपणा दाखवून त्याच्या कानाशिलात..." विशाखा सुभेदारची रणवीर अलाहबादियासाठी खास पोस्ट
कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कॉमेडी शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केलं आणि चर्चेत आला. त्याने केलेल्या वक्तव्याची अवघ्या देशभरामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. रणवीरने शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाला पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला होता. या विचित्र प्रश्नामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात असताना या प्रकरणावर आता बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत.
यूपी-बिहारवर हनी सिंगचे राज्य; २४ तासांत नवीन गाणं झाले हिट, युजर्स म्हणाले- भोजपुरी गायक घाबरले…
आपल्या कॉमेडीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेल्या मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने रणवीर अलाहाबादियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सविस्तर पोस्ट शेअर करत विशाखाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’शो आणि रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आपलं मत मांडलं आहे. प्रेक्षकांनी सुद्धा असे कार्यक्रम पाहताना विचार केला पाहिजे असंही विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशाखा सुभेदार म्हणते,
वि(वेक)नोद संपला.
माणसं दारू पितात. ती प्रमाणात पितात तोपर्यंत ठीक. पण एखादा प्रमाणाबाहेर प्यायला लागला, तर आपण काय म्हणतो; तो दारूवर नाही, तर दारू त्याच्यावर स्वार झालीय. आजच्या सो कॉल्ड तरूण वर्गाचंही काहीसं असंच झालंय. सोशल मीडियाच्या तो एवढा आहारी गेला आहे, की सोशल मीडिया त्याच्यावर पूर्णतः हावी झालाय. त्यामुळे झालंय असं, की त्याने आपला विवेक गहाण ठेवलाय, हेही त्याला कळत नाही. सद्सद विवेकबुद्धी नावाची काही गोष्ट असते, हे तो पूर्ण विसरून गेला आहे. झटपट प्रसिध्दीसाठी…
सोशल मीडियाचा कसाही वापर व्हायला लागलाय. त्यातही विनोदाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खपवलं जातं. त्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल न बोललेलं बरं. अगदी ताजं उदाहरण म्हणजे युट्यूबवरचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कार्यक्रम. विनोद निर्मितीसाठी जर एखादी नीचतम पातळी असेल, तर रणवीर अलाहाबादीया त्याच्याही पुढे गेला. समोरच्या स्पर्धकाला त्याच्या आई वडिलांच्या प्रायव्हसी संदर्भात प्रश्न विचारून विनोद करणं, हे विकृत असल्याचंच लक्षण आहे. खरंतर त्या स्पर्धकाने बाणेदारपणा दाखवून रणवीर अलाहाबादीयाच्या कानाखाली वाजवली पाहिजे होती. त्या रणवीर अलाहाबादीयापेक्षा लोकांनी त्याचं जास्त कौतुक केलं असतं.
महाराष्ट्रात दादा कोंडके, राम नगरकर, राजा गोसावी यांच्यासारखे अनेक विनोदवीर होऊन गेले. दादा कोंडके यांच्या व्दयर्थी संवादांना आणि गाण्यांना लोकांनी भरभरून दाद दिली. पण त्यांना कधी कचाट्यात पकडता आलं नाही. याला म्हणतात टॅलेंट. चि. वि. जोशी, आचार्य अत्रे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे अशा अनेक विनोदी लेखकांनी विनोदासाठी कधीच कमरेखालचा वापर केला नाही.
परकीय कार्यक्रमांचं अनुकरण करताना थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं. रणवीर अलाहाबादीयालाही आईवडील असतील. बहीण असेल. याचा विचार त्याने प्रश्न विचारताना करायला हवा होता. पण काही जणांना येनकेन प्रकारेण पैसा आणि प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाण्याचा रोगच जडला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ सारख्या कार्यक्रमावर उड्या मारणाऱ्या प्रेक्षकांनीही आपली अभिरुची तपासून बघण्याची गरज आहे.
आता स्टॅण्डअप कॉमेडी करणारे किंवा इतरही कलाकार यापुढे जबाबदारीने विनोद निर्मिती करतील अशी अपेक्षा. यापुढे तरी थोडं भान ठेवायला हवं.
मैत्रिणीच्या लग्नामध्ये रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत पोहचली श्रद्धा कपूर, एकत्र फोटोही काढला
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीरने पालकांच्या प्रायव्हसीबद्दल विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ व्हायरल होताच प्रसिद्ध युट्यूबरवर सर्वच स्तरातून त्यावर टीका करण्यात आली होती, त्याच्याविरोधात पोलिस स्थानकांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी या चार जणांची वैयक्तिक चौकशीही सुरू आहे. याशिवाय समय रैनाने देखील ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व शो युट्यूबवरून हटवतोय असं स्पष्टीकरण देत सर्वांची माफी मागितली आहे.