
yashwantrao chavan natya gruh
मुंबई: नाट्यरसिकांच्या लाडक्या माटुंग्यातील यशवंतराव नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Natyasankul) लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवारी 5 ऑगस्टला अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार 6 ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा पुन्हा एकदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.(Drama News)
रिनोव्हेशननंतर पुन्हा तिसरी घंटा वाजणार
नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह 1 ऑगस्टपासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.
यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अंतर्गत सजावट, ध्वनी यंत्रणा, स्वच्छतागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या संकुलात पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या नाट्यगृहाचे काम 30 मे पासून जोरात सुरू झाले होते. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.