
Manoj Jarange Patil
मिळालेल्या माहितीनुसार, अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर बारस्कर यांनी १००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला असून याबाबत त्यांनी ईडीकडे तक्रार केल्याचेही म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना बारस्कर म्हणाले की, मी १५ दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालयाकडे मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे. आंदोलनाच्या नावाखाली जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांनी प्रचंड अवैध माया जमवली आहे. पांडुरंग तारक यांच्याकडे आधी फक्त १० गुंठे जमी होती. आता त्यांच्याडे ५० एकर जमीन आहे. त्यांनी आंतरवली आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.
सुरुवातीला जरांगे पाटील “मी ओपन चर्चा करतो, बंद दाराआड चर्चा करत नाही” असे म्हणायचे. मंतर मात्र त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा आणि सेटिंगही केली. उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांसोबत त्यांनी बंद दाराआड नेमकी काय चर्चा केली हे स्पष्ट करावे, असे आव्हान बारस्कर यांनी दिले.
ज्याप्रमाणे कॅप्टन अशोक खरातच्या पाया पडायला बडे बडे नेते जायचे, नंतर त्याचे बिंग फुटले आणि तो जेलमध्ये गेला, तसेच मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत. जरांगे हे उपोषणाचे नाटक करून मराठा समाजाला फसवत आहेत, असा आरोपही बारस्कर यांनी केला.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता उपोषणाचे व्यसन लागले आहे. जरांगे उपोषणाच्या नावाखाली सलाईनच्या माध्यमातून ग्लुकॉंडी पितात. त्यांनी आता अधिकृतपणे उपोषण सोडावे, मात्र ते उपोषणाचा मांडव सोडू शकत नाहीत, असे बारस्कर म्हणाले.
अंतरवली सराटी येथे २ सप्टेंबर रोजी ‘जिंकलो रे राजा’ अशी घोषणा देऊन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर आणि ‘सगेसोयरे’ या मुद्द्यांवरून जरांगे यांनी मराठा समाजाची, विशेषतः महिलांची फसवणूक केल्याचा दावाही बारस्कर यांनी केला.
मराठा आंदोलनादरम्यान ३५० पेक्षा अधिक तरुणांचे बळी गेल्याचा दावा करत जरांगे यांच्या महागड्या वाहनाच्या वापरावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. आंदोलनात तरुणांचे बलिदान झाले असताना सुमारे २ कोटी रुपये किमतीची Defender गाडी वापरताना जरांगे यांच्या मनाला काहीच वाटले नाही का, असा सवालही बारस्कर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनातील सहभागींबाबतही टीका करण्यात आली आहे. आंदोलनात जरांगे यांच्यासोबत खरा ‘गरजवंत मराठा’ नसून वाळू व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.