
अंतिम मतदार यादी ४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार
कोल्हापूर : राज्यातील १५ हजार १५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. २०२४ ते २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील एकत्रित ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने जूनमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली.
त्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून तयार होणाऱ्या मतदारयादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर या निवडणुका घेण्याची मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती; परंतु आयोगाने वेळेत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रभागनिहाय मतदार यादीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीच्या विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरण्याचे सूचित केले आहे.
निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान?
विशेषतः प्रभागनिहाय यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर आठ-पंधरा दिवसांत निवडणुकांचा बिगुल वाजतो, हा आजपर्यंतचा प्रशासनाचा अनुभव आहे; परंतु पावसाचे प्रमाण पाहून या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यताही आहे.
दृष्टिक्षेपात मतदार यादी कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : १५ एप्रिल
प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध : २४ जुलै
हरकती व सूचना दाखलची मुदत : २९ जुलै
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ ऑगस्ट
गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनी या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) वर्ग करू नयेत आणि त्या ग्रामपंचायतींकडेच कायम ठेवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. यासाठी जगदाळे यांनी बुधवारी मुंबईत जाऊन पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील उपस्थित होते