
कोकण विधान परिषदेत शेकापची मोठी एन्ट्री! अरविंद म्हात्रे मैदानात, महायुतीचे टेन्शन वाढले
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील तब्बल १०२१ मतदार असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारीवर एकमत होत नसतानाच शेकापने आपली चाल खेळली आहे. त्यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान’; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
विशेष म्हणजे या निवडणुकीत महापालिका सदस्य, नगरपालिका आणि नगरपरिषदेतील सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव असलेल्या पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. रायगड जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची पारंपरिक ताकद असल्याने अरविंद म्हात्रे यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे.
अलिबाग येथील शेकापच्या शेतकरी भवनात पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अरविंद म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी (ता. १) रत्नागिरी येथे म्हात्रे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शेकाप पहिल्यांदाच अधिकृत उमेदवार देत आहे. त्यामुळे ही केवळ उमेदवारी नसून कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद दाखवण्याचा शेकापचा राजकीय प्रयत्न मानला जात आहे.
या मतदारसंघात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेली अंतर्गत चुरस अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही. अशा वेळी शेकापने उमेदवार जाहीर केल्याने नाराज मतदार आणि स्थानिक पातळीवरील स्वतंत्र गटांना पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची असलेली पारंपरिक पकड महायुतीसाठी अडचणीची ठरू शकते.
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिव सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉग्रेस घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीत शेकाप सहभागी आहे. महाविकास आघाडीने राज्यातील होऊ घातलेल्या 17 विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. आशा वेळेला शेकाप कडून उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महाविकास आघाडी च्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून अरविंद म्हात्रे यांनी स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रायगड जिल्हा परिषदेमधील अनुभव, स्थानिक स्वराज्य संस्थांतील संपर्क आणि शेकापच्या पारंपरिक मतदारांमधील स्वीकारार्हता यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे.
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये अनेकदा पक्षीय समीकरणांपेक्षा वैयक्तिक संबंध आणि स्थानिक राजकारण प्रभावी ठरते. त्यामुळे शेकापच्या या निर्णयामुळे निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद कायम राहिले तर त्याचा थेट फायदा शेकापला होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकूणच, शेकापच्या या अनपेक्षित निर्णयामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर होताच “माझ्या मागे दाढीवाल्या बाबाची अदृश्य शक्ती आहे,” असे मिश्किल विधान करत निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आणला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात “दाढीवाले बाबा नेमके कोण?” याची चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यामागे राजकीय संकेत शोधण्यास सुरुवात केली आहे.