
'मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान'; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
पुणे : मनोज जरांगे यांना आरक्षण आणि लोकशाहीच्या संवैधानिक बाबींचे शून्य ज्ञान आहे. सरकारने आजवर त्यांचे केवळ अवाजवी लाड पुरवले आहेत आणि याच लाडामुळे आज ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होऊन संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. मनोज जरांगे यांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ‘अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा’ म्हणत उपरोधिक टोलाही लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर गंभीर सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, जरांगे यांची आतापर्यंत तब्बल आठ उपोषणे झाली आहेत. प्रत्येक वेळी ‘मराठा समाजाच्या पाच पिढ्या बरबाद झाल्या’ असा दावा केला जातो. मात्र, जर पाच पिढ्या बरबाद झाल्या असतील, तर या सलग आठ उपोषणांमुळे नेमका कोणाचा आणि काय फायदा झाला, हे आधी जरांगे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करून सांगितले पाहिजे. हाके यांनी आरक्षणाच्या मूळ संकल्पनेवर प्रकाश टाकत स्पष्ट केले की, सामाजिक आरक्षण हे विशिष्ट सामाजिक दुजाभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी असते, ते निव्वळ आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नसते’.
दरम्यान, मराठा समाजाला जी गरिबी आली आहे, ती सामाजिक दुजाभावामुळे आली आहे की केवळ आर्थिक परिस्थितीमुळे, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. मराठा पोरांचे जे नुकसान झाले आहे, त्याला ओबीसी समाज जबाबदार नाही. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आणि गरिबी हटवण्यासाठी शासनाच्या अंदाजपत्रकात तब्बल ९९.३०% निधीची तरतूद केलेली असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तसेच मराठा समाजासाठी खाजगी शिक्षण धोरण हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीच आणले होते, या ऐतिहासिक वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आरक्षणाचा चुकीचा कायदेशीर अर्थ काढून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.
यावेळी हाके यांनी राज्य सरकार आणि मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका केली. मनोज जरांगे यांना भेटायला जाताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या जबाबदार नेत्यांना साध्या संवैधानिक बाबी आणि कायदेशीर मर्यादा समजू नयेत, याबद्दल त्यांनी तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला. सरकारने ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हे निर्णय घेतले असून, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी शेवटी दिला.
मराठ्यांच्या गरिबीला पुढारी जबाबदार, ओबीसी नाही !
“मराठा समाजाच्या गरिबीसाठी ओबीसी आरक्षण अजिबात जबाबदार नाही. राज्यातील आर्थिक आणि शैक्षणिक संपत्तीचे केंद्रीकरण करून बसलेले विशिष्ट राजकीय पुढारीच या परिस्थितीला कारणीभूत आहेत”, असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.