
India vs Australia Semifinal Under 19 World Cup 2022: १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत (U19 World Cup) भारतीय संघाने कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही धडाकेबाज कामगिरी केली आहे. टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या ताकदीने उतरणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाला नमवत अंतिम फेरीत धडक मारण्यास टीम इंडिया उत्सुक आहे.
भारतीय संघ पहिल्या सामन्यानंतरच कोरोनाच्या विळख्यात आला होता. कर्णधार यश धुलसह संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी हे सर्व खेळाडू बरे झाले. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक मोहिमेत टीम इंडियासमोर संकटे आली होती. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.
डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने गतविजेत्या बांगलादेशचे पाच गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम फेरीतील शेवटच्या पराभवाचा बदला घेतला. टीम इंडियाने साखळी गटातील चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशवर मात करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे.
टीम इंडियाचा आत्मविश्वासात वाढ
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे परिणाम टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेवरही झाला होता. कोरोनाच्या महासाथीमुळे मागील दोन वर्षात कोणतेही राष्ट्रीय शिबीर अथवा इतर सपर्धांचे सामने झाले नाहीत. विश्वचषक सुरू होण्याआधी टीम इंडियाने आशिया चषकात सहभाग घेतला होता. टीम इंडियासमोर आज उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे
भारतीय संघाचा कर्णधार यश धुल, शेख रशीद, हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, राज बावा यांच्या खांद्यावर फलंदाजीची भिस्त असणार. तर, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर, फिरकीपटू विकी ओस्तवाल, कौशल तांबे यांना प्रभावी मारा करावा लागणार आहे.
भारताने गतविजेत्या बांगलादेशचे पाच गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम फेरीतील शेवटच्या पराभवाचा बदला घेतला. गेल्या स्पर्धेत भारताला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दोन वेळेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, भारताने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली होती.
आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने
भारत सेमीफायनलमध्ये आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व दिसून आले आहे. नॉकनाउट सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला. टीम इंडियाने 2012 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवत 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. तर, 2000 मध्ये पार पडलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत बाजी मारली.
सामन्याची वेळ?
भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 6.30 वाजता उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा उपांत्य फेरीचा सामना पाहता येऊ शकतो.