Balochistan on fire Section 144 imposed protesters block Quetta-Karachi highway
Section 144 Quetta : बलुचिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. पाकिस्तान सरकारने संपूर्ण प्रांतात कठोर निर्बंध लादत १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू केले आहे. या आदेशानंतर दोन व्यक्ती दुचाकीवर बसू शकणार नाहीत, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन किंवा वापर करता येणार नाही. यासोबतच काळ्या काचा असलेली वाहने, नोंदणी नसलेल्या मोटारसायकली, मिरवणुका, सभा, रॅली यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर चेहरा झाकणे, मग ते मास्कने असो किंवा मफलरने, अशा कोणत्याही स्वरूपातील ओळख लपवणे बेकायदेशीर ठरवले आहे.
सरकारकडून घेतलेला हा निर्णय प्रांतात आधीच असलेल्या असंतोषाच्या ज्वालेला अधिकच इंधन टाकणारा ठरला आहे. खुजदार जिल्ह्यातील जवाह आणि जहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलकांनी क्वेटा-कराची महामार्ग रोखून धरला आहे. या महामार्गाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक ठप्प झाली असून प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निदर्शनांचा उगम एका धक्कादायक घटनेतून झाला. स्थानिक नेत्यांच्या आरोपानुसार, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी हब चौकी येथे प्रवासी व्हॅन थांबवली. त्यामध्ये असलेल्या महिला व लहान मुलांना बाहेर काढल्यानंतर, पुरुष प्रवाशांना व वाहनालाच अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. या प्रकाराला “जबरदस्तीचे अपहरण” म्हणून स्थानिक लोक पाहत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी महामार्ग रोखून निदर्शने सुरू केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Tianjin Summit 2025 : SCO शिखर परिषदेत पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते बसवण्यापर्यंत ‘रोबोट’च करणार पाहुणचार
नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) चे केंद्रीय प्रवक्ते शाहजेब बलोच यांनी क्वेटा प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत या निर्बंधांचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, “हे आदेश केवळ असंवैधानिक नाहीत तर लोकशाही अधिकारांचा गळा दाबण्याचा उघड प्रयत्न आहेत.” शाहजेब बलोच यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, बलोचिस्तानात आणि देशभरातील वंचित समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. अनेकांना जबरदस्तीने बेपत्ता केले जात आहे. जर खरोखरच कुणी गुन्हेगार असेल, तर त्याला न्यायालयात उभे केले पाहिजे; पण संपूर्ण समाजाला शिक्षा देणे हे सरळ सरळ जातीय शुद्धीकरण असून वसाहतवादी मानसिकतेचे दर्शन घडवते.
खुजदारमधील स्थानिक नेते बाबा फतेह जहरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रशासनाने शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला. “सुरक्षा दलांनी महिलांशी गैरवर्तन केले, तरुणांना मारहाण केली. हे अत्याचार असह्य आहेत. आम्ही लोकांना मोठ्या संख्येने निदर्शनात सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत,” असे ते म्हणाले. स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की, जर सरकारकडे काही शंका असेल तर कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी. पण नागरिकांवर अन्याय करून, महिलांवर बळाचा वापर करून आणि बेपत्ता करण्याच्या घटनांमुळे प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे ढासळत चालला आहे.
बलुचिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून असंतोष वाढत चालला आहे. स्थानिक लोक स्वतःला उपेक्षित मानतात. शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा यांचा अभाव, तसेच सततचा सुरक्षा दलांचा दबाव या सगळ्यामुळे असंतोषाला सतत खतपाणी मिळत आहे. कलम १४४ सारखे कठोर निर्बंध या असंतोषावर उपाय नसून, उलट या ज्वालेला अधिक भडकवणारे ठरत आहेत. सरकारला वाटते की निर्बंधांमुळे शांतता प्रस्थापित होईल; परंतु लोकांचा विश्वास आहे की शांततेसाठी न्याय आवश्यक आहे. जोपर्यंत जबरदस्तीच्या बेपत्ता घटना थांबत नाहीत, आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष शमणे कठीण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saffron Shawl : मोदी इफेक्ट! आता असीम मुनीरला कोणी ओढवली भगवी शाल? पाकिस्तानच्या फील्ड मार्शलचा VIDEO VIRAL
बलुचिस्तान आज एक उकळता ज्वालामुखी बनला आहे. सरकारचे कठोर निर्बंध आणि प्रशासनाचे दडपशाही धोरण यामुळे प्रांतातील लोक अधिकच संतप्त झाले आहेत. “शांतता हवी असल्यास न्याय द्या” असा संदेश आज या प्रांतातून जोरदारपणे उमटतो आहे. आगामी काळात पाकिस्तान सरकारने कोणता मार्ग अवलंबतो दडपशाहीचा की संवादाचा यावर बलुचिस्तानचा भवितव्य अवलंबून आहे.