
फोटो सौजन्य AI
चीनने आपल्या नागरिकांना एस्वातिनीमधून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे . देशातील सुरक्षा परिस्थिती गुंतागुंतीची असल्याचे सांगत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा इशारा दिला . विशेषतः सायबर फसवणूक , ऑनलाईन जुगार आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित धोके वाढल्याचे चीनने म्हंटले आहे .
चीनच्या मते एस्वातिनीमध्ये राहणाऱ्या किंवा तेथे जाणाऱ्या नागरिकांना सध्या अत्यंत उच्च सुरक्षा धोका निर्माण झाला आहे . चीनने एस्वातिनीमध्ये असलेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या तुलनेने सुरक्षित भागात स्थलांतर करणायचा सल्ला दिला आहे . चीनने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही पाऊले उचलली असल्याचे सांगितले आहे .
या घटनेला केवळ एक सुरक्षा इशारा म्हणून पाहिले जात नाही . कारण एस्वातिनी हा तैवानसोबत अधिकृत राजनैतिक संबंध ठेवणारा आफ्रिकेतील एकमेव देश आहे . जगातील मोजक्या देशांपैकी एस्वातिनी अजूनही तैवानला राजनैतिक मान्यता देतो . चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो आणि तैवानला स्वतंत्र देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यास विरोध करतो .
त्यामुळे एस्वातिनीचे तैवानसोबत असलेले संबंध बीजिंगसाठी अत्यंत्य संवेदनशील मुद्दा आहे . या वर्षी मी महिन्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांनी एस्वातिनीला भेट दिली होती या दौऱ्याला चीनने तीव्र विरोध केला होता . दौऱ्यापूर्वी काही आफ्रिकी देशांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाला हवाई परवानगी नाकारल्याने वाद निर्माण झाला होता . तैवाननें यामागे चीनचा दबाव असल्याचा आरोप केला होता .
चीनने यापूर्वीही आफ्रिकी देशांवर तैवानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्यासाठी दबाव आणला होता . एस्वातिनी मात्र अजूनही तैवानसोबत संबंध कायम ठेवत आहे . त्यामुळे आफ्रिकेतील तैवानच्या उरलेल्या राजनैतिक मित्रदेशांपैकी एस्वातिनीचे महत्व वाढले आहे . दरम्यान चीनने आफ्रिकेतील इतर देशांसाठी व्यापार सवलती जाहीर करताना एस्वातिनीला त्यातून वगळले असल्याचे वृत्त आहे .
त्यामुळे सुरक्षा इशाऱ्यासोबतच व्यापार आणि राजनैतिक दबावाचाही हा व्यापक भाग आहे का याबाबत चर्चा सुरु झाली आहे . सध्या चीनने एस्वातिनीविरोधात थेट राजनैतिक कारवाई जाहीर केली नाही . मात्र नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेला सल्ला आणि तैवानसोबतचे एस्वातिनीचे मजबूत संबंध यामुळे चीन तैवान संघर्षाचा आफ्रिकेतील राजनैतिक प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे .